डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती, राहुरी तालुका. श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी, जि. अहमदनगर
काही चुकिच्या नेतृत्वाने व नियोजनाने त्याची फिरणारी चाके सोन्याचा धूर निघणाऱ्या चिमण्या अचानक बंद झाल्या व सभासद, शेतकरी, कामगार व छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अखेर डॉ.बा.बा.त. सहकारी साखर कारखाना बंद पडला व राहुरी तालुक्याची वाताहात झाली
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती, राहुरी तालुका.
श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी, जि. अहमदनगर
राहुरी( प्रतिनिधी)भारत हा कृषिप्रधान देश म्हणून त्याची संपुर्ण जगात ख्याती आहे. अशा या भारत देशामध्ये सहकार चळवळ उभी राहिले पाहीजे म्हणून त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या देशाचे नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, आदरणीय स्वर्गिय वसंतदादा पाटील, यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी करून सहकार चळवळीच्या माध्यमातून जिल्हा तालुका व खेडे गावात सहकार चळवळ रुजली पाहिजे म्हणून त्यांनी खुप मोठे स्वप्न पाहिले. व ती प्रत्यक्षात खूप काबाडकष्ट करून सहकार चळवळ उभी केली. या मागे त्यांची खूप मोठी दुरदृष्टी होती.
सहकार चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल. सहकाराच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या हाताला काम मिळेल तसेच खेडोपाडी, गावा-गावात सहकाराच्या माध्यमातुन मोठमोठी विकास कामे होतील त्यामध्ये रस्ते असतील, शाळा-कॉलेज, हॉस्पिटल (दवाखाने) इंजिनिअरींग कॉलेज, मेडिकल कॉलेज, वेगवेगळी टेक्नालॉजी उभी करता येईल व त्यामधून खेडेगावातील शेतकरी, शेतमजूर, दिनदलीत, इतर मागासवर्ग या सामाजाचा शैक्षणिक तसेच व्यापार उद्योग व्यवसाय तसेच शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा, लाभ होईल. ही विचारधारा घेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सद्भावना मनामध्ये ठेवून सहकार चळवळ उभी केली. त्यालाच सहकाराची पंढरी म्हणून संबोधले गेले.
ह्याच प्रेरणेने अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा वारसा पुढे चालु ठेवण्यासाठी अगर घेवून जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जुणे राजकीय मंडळींनी हाच वारसा पुढे कायम ठेवून सहकार चळवळ उभी केली आणि त्या माध्यमातुन त्यांनी आपले जीवाचे रान करून काबाडकष्ट घेवून या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी शेती विषयक उद्योगधंदे निर्माण केले पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी सहकारी साखर कारखान्यांची तसेच सहकारी दुध संघ, सहकारी
बँक, सहकारी देखरेख संघ, सहकारी सोसायटी, सुतगिरणी, खरेदी विक्री संघ, मद्यार्क प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समित्या आदींची शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था उभा करुन त्या माध्यमातून खेडेगावचा विकास कसा करता येईल याची संकल्पना दुरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून त्याची निर्मिती पुढच्या भावी पिढीसाठी निर्माण केली. हा त्यांचा मोठेपणा होता.
त्याकाळी अहमदनगर जिल्ह्यात पुरेसे शिक्षणाकरीता कुठलेही साधन नसताना, कुठल्याही प्रकारची यंत्रणा नसताना, पाठबळ नसताना, आर्थिक अडचणी असताना, त्यांनी या सहकार चळवळ उभी करून साखर कारखानदारी मोठ्या दिमाखात उभ्या केल्या. त्यांच्या या कार्याला सलाम आहे.
अशाच या जिल्ह्यामधील स्व. धनंजयराव गाडगीळ, स्व. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब संतुजी थोरात साहेब, स्व. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे, स्व. शंकरराव काळे साहेब, स्व.शंकरराव कोल्हे साहेब, स्व. मारुतराव घुले पाटील, स्व. शिवाजीराव नागवडे, स्व. भास्करराव गलांडे पाटील, स्व. आबासाहेब निंबाळकर, श्री. यशवंतराव गडाख साहेब, स्व. भांगरे पाटील, स्व.पी.बी.कडु पाटील, स्व. आण्णासाहेब कदम, स्व. बडधे पाटील, स्व. अनंतशेठ धावडे, स्व. रामदास धुमाळ पाटील असे अनेक दिग्गज नेत्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. अशातच याला अपवाद ठरला तो डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना या कारखान्यासाठी राहुरी तालुक्यातील जेष्ठ नेत्यांनी आपले फार मोठे योगदान राहुरी तालुक्यासाठी समर्पित केले.
राहुरी तालुका हा सर्व सोईंनी सुजलाम, सुफलाम तालुका आहे. या तालुक्यामध्ये सहकार चळवळ उभी राहीले पाहिजे म्हणून या तालुक्यातील जुन्या जाणत्या जेष्ठ नेत्यांनी आपल्या जीवाचे रान करून, काबाड कष्ट करून राहुरी तालुक्यात सहकारी संस्थांची उभारणी केली आणि त्या माध्यमातुन तालुक्यात शैक्षणिक / औद्योगिक विकासाची गंगा वाहु लागली. त्यामध्ये राहुरी, देवळाली प्रवरा, तालुक्यातील अनेक खेडेगावातील छोटे-मोठे उद्योगधंदे मोठ्या दिमाखाने उभे राहिले. तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था मोठ्या दिमाखाने उभ्या राहिल्या, रस्ते असतील, पाणी प्रश्न असेल, शेतीमालाला योग्य भाव असेल अशा अनेक योजनांचा महापुर सुरु झाला. भावी पिढी शिक्षित झाली. नोकरी व्यवसाय हाताला काम मिळाले. अशातच या राहुरी तालुक्यातील सभासद, शेतकरी व कामगार यांचा हक्काचा मालकीचा असणारा एक काळ सोन्याचा धूर निघणारा कारखाना
काही चुकिच्या नेतृत्वाने व नियोजनाने त्याची फिरणारी चाके सोन्याचा धूर निघणाऱ्या चिमण्या अचानक बंद झाल्या व सभासद, शेतकरी, कामगार व छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले आणि अखेर डॉ.बा.बा.त. सहकारी साखर कारखाना बंद पडला व राहुरी तालुक्याची वाताहात झाली, व्यापारी पेठ उध्वस्त झाली, छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद पडले, नोकऱ्या नाही, शिक्षण नाही, तरुण वर्ग सैरभिर झाला, शेतकरी उध्वस्त झाला, दुसऱ्याच्या हातापाया पडुन आमचा ऊस घेवून जा, तुमच्या पाया पडतो अशी दयनीय अवस्था झाली. ही वेळ आज राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली. ही बाब खुप दुर्देवी आहे.
हा कारखाना उभारणीसाठी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी खुप खस्ता खाऊन, शेअर्स, भांडवल उभे केले. आज ह्याच राहुरी कारखान्याची तेथील असणाऱ्या कामगारांची अवस्था बघवत नाही. आमच्या कामगार भगिनी असतील, कामगार बंधु बांधव असेल आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. चुकीचे नियोजन, चुकीच्या नेतृत्वाकडे गेल्यामुळे प्रचंड भ्रष्ट्राचार, शैक्षणिक संस्थेमध्ये, शिक्षण भरतीमध्ये, प्रवेश भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचंड लुट केली जाते ही दुर्देवी बाब आहे या गोष्टीचा निषेध करावा तेव्हा कमीच आहे.
अशा या अहमदनगर जिल्ह्यामध्ये १ नंबर असणारा कारखाना आज शेवटचा घटका मोजत आहे. या कारखान्याकडे आज निवडणुक घेण्यासाठी निधी उपलब्ध नाही ही खेदाची बाब आहे. म्हणून यावरील सर्व गोष्टींचा विचार विनीमय करणेसाठी व निवडणुक निधी उभा करून निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी राहुरी कारखाना बचाव कृती समिती तालुक्यातील सर्व राजकीय, सर्व पक्षिय सामाजिक क्षेत्रातील लोकांना, आवाहन करीत आहे की आपण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या पदाधिकारी, आजी-माजी आमदार-खासदार, आजी-माजी चेअरमन, संचालक, सरपंच, विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग, छोटे-मोठे उद्योग व्यवसायकार तसेच तालुक्यातील विद्यार्थी तरुण वर्ग या सर्वांनी डॉ.बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी व तो पून्हा पूर्ववत चालु होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन आपल्या तालुक्याची कामधेनु वाचविण्यासाठी व राहुरी तालुक्याची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी पुढाकार घेवुन आपण सर्वांनी मतभेद बाजुला ठेवून एकजुटीने आपला कारखाना व शैक्षणिक संस्था मोठ्या दिमाखाने पुन्हा उभा राहण्यासाठी आपण संघटीत व्हावे ही आपणा सर्व राहुरी तालुक्यातील जनतेला नम्र आवाहन करतो.
आपले नम्र
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती राहुरी तालुका
श्री. अमृत पा. धुमाळ
श्री. अरुण पा. कडु
श्री. अर्जुन पा. म्हसे
श्री. पंढरीनाथ पा. पवार
श्री. राजुभाऊ पा. शेटे
श्री. सुभाष पा. करपे
श्री. भरत पा. पेरणे
श्री. संजय पा. पोटे
श्री. दिलीप पा. इंगळे
श्री. रविंद्र पा.मोरे
श्री. सुखदेवराव पा. मुसमाडे
श्री. नानासाहेब पा. पठारे
श्री. सुधाकर पा. शिंदे
श्री. सुधाकर पा. कराळे
श्री. आप्पासाहेब पा. दुस
श्री. बाळासाहेब पा. जठार
श्री. नामदेवराव पा. कुसमुडे
श्री. अनिल शिरसाठ
श्री. अजित पा. जाधव
श्री. नारायणराव टेकाळे
श्री. अरुण पा. डोंगरे
आदि सर्व कारखाना सभासद, कामगार, शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग
दिनांक : ०९/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता.
मेळाव्याचे ठिकाण : पांडुरंग लॉन्स, स्टेशन रोड, राहुरी