जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीवर अजित काळे यांचा आक्षेप; ‘शेतकऱ्यांना त्रास नको, साखर कारखान्यांची वसुली आधी करा’
जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली, उताऱ्यावर बोजा कायम ठेवणे आणि मालमत्ता जप्तीच्या मोहिमे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांनी या कारवायांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीवर अजित काळे यांचा आक्षेप; ‘शेतकऱ्यांना त्रास नको, साखर कारखान्यांची वसुली आधी करा’
बातमी सविस्तर:
नेवासा (प्रतिनिधी) –
जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांकडून होत असलेली सक्तीची कर्जवसुली, उताऱ्यावर बोजा कायम ठेवणे आणि मालमत्ता जप्तीच्या मोहिमे विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांनी या कारवायांवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
काळे साहेबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांची थकीत कर्जवसुली करताना त्यांच्यावर दबाव टाकणे, त्यांच्या मालमत्तांवर बोजा ठेवणे आणि जप्तीची नोटीसा देणे ही अमानुष आणि अन्यायकारक कृती आहे. ही मोहीम तात्काळ थांबवावी. जिल्हा बँकेने गंगापूर तालुक्यातील डोणगावकर साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते. त्याची वसुली झाली का? त्याचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करावा.”
ते पुढे म्हणाले, “नियमबाह्यपणे, राजकीय दबावाखाली वाटप केलेल्या कर्जांची वसुली अजून झाली नाही, मात्र बँक शेतकऱ्यांवर दडपण आणत आहे. शेतकऱ्यांना त्रास देण्यापूर्वी साखर कारखान्यांकडून थकबाकी वसूल करा. अन्यथा या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात आंदोलन छेडले जाईल.”
मागण्या पुढीलप्रमाणे:
1. जिल्हा सहकारी बँकेने साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जांचा तपशील जाहीर करावा.
2. कर्जवसुलीची मोहीम तात्काळ थांबवावी.
3. शेतकऱ्यांच्या नावावर असलेले बोजे उताऱ्यावरून काढून टाकावेत.
4. नियमबाह्य कर्जवाटप करणाऱ्यांवर कारवाई करावी.
शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, बँकेच्या एकतर्फी कारवायांमुळे शेतकरी वर्ग आर्थिक व मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहे. यापुढे जर शेतकऱ्यांवर बेकायदेशीर वसुलीचे प्रयत्न झाले, तर व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा अजित काळे यांनी दिला आहे.
(खबरनामा न्यूज – नरेंद्र पाटील काळे)