शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय स्थापन करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव.
“शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय” स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामपंचायत मौंदळा, ता. नेवासा, जि. अहमदनगर
दि. १४/०८/२०२५
विषय: शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय स्थापन करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव.
दि. १४/०८/२०२५ रोजी ग्रामपंचायत मौंदळा येथे झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते महत्त्वाचा ठराव मंजूर करण्यात आला. ठराव क्र. १६/१/५ नुसार, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती व्यवसाय, वाहतूक, शिक्षण व इतर जीवनावश्यक गरजांसाठी अत्यावश्यक असलेल्या शिव पाणंद रस्ते व शिवार रस्त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र “शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय” स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
ग्रामसभेत सचिव अनिकेत आग्रे यांनी विषय मांडताना सांगितले की –
महाराष्ट्र राज्यातील 50% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेती व्यवसायात शिवार रस्ते व पाणंद रस्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. दररोज शेतकरी शिवारातून पिकांची वाहतूक, खत, बियाणे, औजारे आणणे-नेणे, विद्यार्थ्यांना शाळेत नेणे अशा कारणांसाठी या रस्त्यांचा वापर करतात. मात्र अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून काही रस्ते अतिक्रमणामुळे बंद झाले आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिके बाजारात वेळेत पोहोचत नाहीत, वाहतूक खर्च वाढतो, शेतमाल खराब होतो. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर अनेक ठिकाणी शासनाच्या अंमलबजावणीत विलंब होत आहे.
अतिक्रमण मुक्ती आणि रस्त्यांचा तातडीने विकास हा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्वतंत्र शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय स्थापन करून या विषयाचे केंद्रीकृत नियोजन व अंमलबजावणी करावी, अशी मागणी ठरावातून करण्यात आली.
प्रमुख मुद्दे:
1. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायासाठी शिवार व पाणंद रस्ते अत्यावश्यक.
2. अनेक रस्ते अतिक्रमणामुळे बंद, तर काहींची अवस्था अत्यंत खराब.
3. वाहतूक अडचणींमुळे शेतमाल वेळेत बाजारात पोहोचत नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान.
4. न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित, शासनस्तरावर निर्णय व अंमलबजावणीत विलंब.
5. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र शिव पाणंद रस्ता विकास मंत्रालय स्थापन करण्याची तातडीची गरज.
ग्रामपंचायत मौंदळा व सर्व ग्रामस्थांच्या वतीने ही मागणी शासनापर्यंत पोहोचवून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले.
प्रस्तावक:
श्री. अनिकेत आग्रे (सचिव, ग्रामपंचायत मौंदळा)
अनुमोदक:
श्री. गणेश अनंत आग्रे
स्वाक्षरी:
ग्रामपंचायत अधिकारी, मौंदळा
सरपंच,




