शेतकरी सर्जिकल स्ट्राईक
. से.नी. इंजी. डॉक्टर अर्जुन तोरवणे, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, गावखेती

खबरनामा न्यूज संपादकीय
शेतकरी सर्जिकल स्ट्राईक… लेख
सर्जिकल स्ट्राईक हा शब्द वाचून, ऐकायला खूप अभिमान वाटतो. परंतु जेव्हा शेतकरी सर्जिकल स्ट्राईक वाचून, ऐकायला खूप त्रासदायक, आत्मक्लेशदायक वाटते. कारण शेतकरी सर्जिकल स्ट्राईक शक्यच नाही कारण या राज्यकर्त्यांनी, राजभोगातील लोकांनी व व्यापाऱ्यांनी गावात गट तट तयार करून गावाची व शेतकऱ्यान मध्ये फुट पाडून ठेवली आहे. शेतकरी एकत्र येत नाहीत म्हणूनच शेतकऱ्यांच्या समस्यां निवारण होऊच शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या आहेत. १) कृषी मालाला उत्तपादन आधारित न्यूनतम हमी भाव मिळाला पाहिजे २) स्वामिनाथन आयोग लागू करणे ३) पिक विमा मिळाला पाहिजे ४) नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशा प्रकारे मानव व निसर्ग निर्मित ३० प्रकारच्या समस्या आहेत. परंतु या समस्या सोडवण्यासाठी अनेक योजना आहेत परंतु गावपातळीवरील आवश्यक यंत्रणा नसल्याने शेतकऱ्याच्या समस्या सोडण्यापासून राज्य करते पळवाट काढत असतात. म्हणून शेतकरी सर्जिकल स्ट्राईक भविष्यात नक्की होईल याची मला खात्री आहे. कारण…..
शेतकरी निसर्ग दत्त शेती करतो, निसर्गाच्या लहरी पणा मुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मी काही कटू सत्य सांगतो १) जगभरातील सर्व व्यवसायांमध्ये, शेती व्यवसाय सर्वात धोकेदायक व असुरक्षित आहे कारण – “उत्पादन पूर्व, उत्पादन घेतांना आणि उत्पादन आल्या नंतर” या तिन्ही प्रमुख टप्प्यांवर जोखीम व अनिश्चितता आहे, म्हणूनच शेती व्यवसाय अतिशय त्रासदायक आहे. कटू सत्य….२) शेतकरी शेतमाल शासनाला किंवा व्यापाऱ्यांना विक्री करीत नसुन, शेतकरी शेतमाल बाजारपेठेत व्यापाऱ्यांना किंवा शासनाला फक्त देण्यासाठी जातो. कारण शेतमालाची किंमत शासन किंवा व्यापारी ठरवतो. कटू सत्य….३) जगातील सर्व उत्पादक, स्वतःच्या उत्पादनांची किंमत, उत्पादन खर्च, अधिक नफा गृहित धरून ठरवतात परंतु शेतकऱ्यांच्या उत्पादनांची किंमत शासन किंवा व्यापारी ठरवतो. असे सर्व असतांना शेतकऱ्यांना न्याय तरी कसा मिळेल ? जो कामधंदा करून स्वताचे कुटुंब चालवण्यासाठी काहीच शिल्लक राहत नसेल तर तो कामधंदा कशाला करायचा ? किती दिवस शासनाची लाचारी, सहानभूती वर जगायचे ? शासन शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवता पळवाट काढून रोख रक्कम, कर्जमाफी, अनुदाने हा लोकप्रिय मलम लावून , शेतकऱ्यांना दिलासा देत थोपवून ठेवले आहे. आजपावेतो केंद्र व राज्य सरकारे मिळून दोन लक्ष अठ्ठावीस हजार कोटींची कर्जमाफी देवुन, सत्ता देणारी योजना म्हणून कर्जमाफिकडे पहिले व आयोग लागू न करण्याबाबत चालढकल केलेली दिसते. म्हणूनच हमी भाव मिळत नाही.
कष्टाचे, हक्काचे मिळत नाही म्हणून किती दिवस शेतकऱ्यांनी रडायचे ? किती दिवस लाचारीने जगायचे ? म्हणून सर्व शेतकऱ्यांना विनंती, एकदाच लढायचे आणि सर्व प्रश्न निकाली काढायचे….! शासनाने फुकटची रेवडी वाटप सुरु केल्यामुळे शेती कामा साठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या पोरांना कुणी पोरी देत नाही किती लाचारीने जीवन जगायचे ? शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे एकाच उत्तर फिक्स बाजार भाव. शेतकरी बांधवांनी विचार करावा. जर फिक्स बाजार भाव निश्चित करून मिळाला तर काय होईल ? शेतकऱ्यांचे पूर्वीचे वैभव प्राप्त होईल. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे सूत्र सुरु होईल. मग शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सहज लग्नासाठी मुली मिळतील आणि सर्वांची लग्ने वेळेत होतोल.शेतकऱ्यांचे बंगले होतील. बँकेत चांगला बँक बँलन्स राहील. चारचाकी गाडी दारासमोर असेल. मार्केट मध्ये पत वाढेल. गावे सुजलाम सुफलाम होतील. कुणापुढे लाचारीने हात पसरावयाची गरज येणार नाही आणि हे सर्व हवे असेल तर त्याला एकाच नामी उपाय आहे तो म्हणजे संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचा “ शेतकरी सर्जिकल स्ट्राईक “
काय आहे शेतकरी सर्जिकल स्ट्राईक ? १) सर्व प्रथम ६ महिने आगोदर एक तारीख जाहीर करायची, (ती तारीख, ज्या हंगामात कृषी मालाचे बाजार भाव कमी होतात ती असावी ) २) त्या तारखेच्या आधी शेतकऱ्यांनी शेतातील सर्व प्रकारचा माल काढून जमिनी मोकळ्या कराव्या व जमिनीला तापत ठेऊन, जमिनीला विश्रींती द्यावी. ३) दिलेल्या तारखेनंतर कुणाच्याच शेतात शेतमाल, भाजीपाला असणार नाही सर्व रान मोकळे दिसले पाहिजे. ४) भाजीपाला फक्त घरी खाण्यापुरता पिकवायचा. ५) शक्य तो इतर कोणतेही उत्पादने विक्रीसाठी शहरातील बाजारात नेऊ नये, आणि जो पर्यंत बाजारभाव बांधून मिळत नाहीत, हमी भाव निश्चित होत नाहीत, तो पर्यंत एक दाणाही पिकवायचा नाही. साधारणता दोन तीन महिन्यात सर्व हादरतील, शासन शेतकऱ्यांशी तडजोडी करून हमी भाव, फिक्स भाव बांधून देण्यास तयार होईल. एवढेच नाही तर या हमी भावासाठी, शेतीच्या नियोजनासाठी मी सुचवलेली गावखेती योजना सुद्धा लागू करण्यास सुरवात होईल. नको मोर्चा, नको दंगा, शांतता मार्गाने शेतकरी सर्जिकल स्ट्राईक पूर्ण होईल आणि तेथून पुढे शेतकऱ्यांची लाचारी संपेल आणि ती पण कायमची.
मी हे लिहितो आहे कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे माझ्या समस्त भारतीय शेतकरी बंधूंचे व माझे दु:ख एकच आहे. हा शेतकरी सर्जिकल स्ट्राईक होईल कि नाही हे मला माहित नाही. पण शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांचे, समस्यांचे उत्तर मिळण्याचा हा एकाच नामी उपाय दिसतो. हा उपाय शेतकऱ्यांना पटला, तर नक्कीच एक दिवस चळवळ उभी होईल आणि एक दिवस प्रश्न सुटेल.या साठी कुठल्याच राजकीय पुढाऱ्यांचे पाय पकडावे लागणार नाहीत. हि चळवळ शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी करावयाची आहे. मी कुणालाच असे करा असे म्हणत नाही पण शेतकऱ्यांनी असे केले तर काय होईल ? हे विचार मांडत आहे. हे विचार आवडले तर शेतकऱ्यांना सांगा, नाही सांगितले तरी काहीच फरक पडणार नाही आणि आपल्या श्रीमद्वगवव्द्रिता मध्ये सांगितल्याप्रमाणे कुठलेच कर्म वाया जात नाही. एक दिवस त्याचे फळ नक्कीच मिळणार आहे. चला तर मग करूया “ शेतकरी सर्जिकल स्ट्राईक “
वाचल्याबद्दल धन्यवाद. सूचक
आपलाच एक वैतागलेला अनामिक शेतकरी
शब्दांकन
. से.नी. इंजी. डॉक्टर अर्जुन तोरवणे,
कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी, गावखेती संकल्पना शोधकर्ता